सोलापूर प्रतिनिधी/समाधान रोकडे : उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे एकाच महिन्यात 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील बी बी दारफळ, कौठाळी, वडाळा,रानमसले येथे कोरोनाचा कहर सुरू आहे.दररोज तपासणी व लसीकरण सुरू असते तरी देखील रुग्ण संख्या वाढत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील या गावांमधून मृत्यूची संख्या दररोज वाढत असल्याचे चित्र दिसत आहे .सोमवारी तर बीबीदारफळ या गावातून एकाच दिवशी कोरोनामुळे सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे भयंकर वातावरण निर्माण झाले आहे कोरोनाच्या भितीमुळे कोणी गावात मृतांना खांदा द्यायला सुद्धा तयार होत नसल्याचे चित्र दिसत आहे.मृतांना वाहनांमध्ये घेऊन जावावे लागत आहे. बीबीदारफळ पाठोपाठ कौठळी या गावात देखील गेल्या महिन्यापासून मृतांची संख्या 25 पार झाली आहे. तसेच कळमण गावातून देखील कोरोनामुळे मृतांची संख्या जास्त झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जणांना हृदयविकाराचे धक्के बसून त्यात देखील अनेक जणांचे प्राण गेलेले आहेत.एकीकडे कोरोना रोग तर दुसरीकडे घाबरून हृदय विकाराच्या झटक्याने अनेक जण आपले प्राण गमावत असल्याचे उत्तर सोलापूर तालुक्यातील या गावामधून दिसून येत आहे.