सोलापूर, दि. 7- मराठी भाषेला समृद्ध परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत रामदासापर्यंत संतांनी विविध वाड्.मय प्रकारात लिखाण केले. आजच्या संगणक युगात उत्तम संवाद साधणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी व्यावहारिक भाषिक कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. सुधा पेशकर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाड्.मय संकुलाच्या मराठी भाषा विभागतर्फे आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानात डॉ. पेशकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. दत्ता घोलप यांनी करून दिला.
डॉ. पेशकर म्हणाल्या, जाहिरातीला पासष्टावी कला म्हटले जाते. आपल्या वस्तूंची उत्पादनांची विक्री व्हावी म्हणून जाहिरात केली जाते. जाहिरात ही वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, नभोवाणी इ. माध्यमांसाठी केली जाते. या माध्यमांसाठी जाहिरात लिहणे ही एक कला आहे. त्याचबरोबर या माध्यमांसाठी मुलाखत घेणे, त्याचे लिखाण करणे ही देखील एक आवश्यक बाब आहे. प्रसारमाध्यमे ही समाजाच्या आरसा आहेत. आज प्रसारमाध्यमांमध्ये काम करण्याच्या संधी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यासाठी आपल्याला भाषिक कौशल्य अवगत करणे हे महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रामध्ये बातम्याबरोबरच वृत्तलेखन, इतिवृत्त,असे विविध प्रकारचे केले जाते. त्यासाठी संवादी लिखाण करणे महत्त्वाचे असते. भाषिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपणास उत्तम वाचन, श्रवण, निरीक्षण, मनन, चिंतन करणे आवश्यक असते, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, भाषेच्या विविधतेमुळे भाषेतील अनुवादाला प्राधान्य मिळत आहे. परकीय देशांमध्ये त्यांच्या भाषेतील संवाद चटकन् आपल्याला आपल्या भाषांमध्ये अनुवादित स्वरूपात प्राप्त होतो. मराठीत देखील त्याची सोय उपलब्ध आहे. मराठी भाषा प्रगत असण्याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आजच्या संगणक युगात पत्रलेखन हरवत चालले आहे. पत्रलेखनासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक असते. विविध स्पर्धा परीक्षासाठी ही भाषिक कौशल्य उपयुक्त ठरतात, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. विद्या लेंडवे यांनी मानले.