सोलापूर : आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच कारभार सोलापूर महापालिकेचा आणि स्मार्ट सिटीचा आहे. कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्यामुळे गरज नसलेली कोट्यावधी रुपयांची कामे केली जात आहेत. शहरात वाढते ट्रॅफिक आणि अपघात यावर उपाय म्हणून लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सोलापूर शहरात दोन उड्डाणपूल मंजूर केले एवढेच नव्हे तर यासाठी तब्बल एक हजार कोटी रुपये देखील मंजूर केले .याला चार वर्षे उलटली.

भूसंपादनासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ 45 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत दिले देखील. मात्र भूसंपादनाची रक्कम तीनशे कोटी वर गेली असून उड्डाणपूल व्हावेत अशी कोणाचीच इच्छा नाही शिवाय नुकत्याच मंजूर झालेल्या राज्याच्या बजेटमध्ये सोलापुरातील या दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची एक रुपयाची रक्कम देखील तरतूद केली नाही त्यामुळे आता हे दोन्ही उड्डाणपूल आपल्याला विमानसेवा प्रमाणे फक्त चित्रातच पहावे लागणार आहेत. महाशिवरात्रीच्या आजच्या पावनपर्व निमित्त सोलापूर शहरातील नागरिक आपला तिसरा डोळा उघडतील का आणि चाललेल्या सर्व अनागोंदी कारभारावर आवाज उठवतील का हा खरा प्रश्न आहे