येस न्युज मराठी नेटवर्क : रेल्वे रुळांशेजारील जमिनींवर सांडपाण्यातून भाजी पिकवून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अशा जमिनींवर फुलांची शेती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. फुलांची शेती करू इच्छिणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत आणि मार्गदर्शन ही करण्यात येईल. प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनीही रेल्वे जमिनींवर फुलांची शेती करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाला दिला.मध्य रेल्वेवरील विविध तुकड्यात विभागलेल्या सुमारे १०० एकरपेक्षा जास्त जमिनी रुळांच्या शेजारी आहे. रेल्वे जमिनींवर कब्जा होऊ नये, यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जमिनीची निगा राखण्यासाठी ही जमीन देण्यात येते.