सोलापूर, दि.4- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा प्रकारे साजरी करावी याबाबतचे नियम व अटी स्पष्ट करून ते जाहीर करावेत, अशी मागणी क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष दास शेळके यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी असून दरवर्षी हा उत्सव संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. सोलापुरातही आठ दिवस अगोदर या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येते. सार्वजनिक मंडळांच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, आरोग्य व रक्तदान शिबिरे, ऐतिहासिक देखावे व मिरवणुका आदी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा अन्य उत्सवाप्रमाणेच शिवजयंतीवरही कोरोनाचे सावट दिसून येते. सध्या कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन जाहीर केलेला आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा प्रकारे साजरी करण्यात यावी याबद्दल अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक तत्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नाहीत वा नियमावली ठरविली गेली नाही. त्यामुळे शिवजयंती कशा प्रकारे साजरी करावी याबाबत शिवप्रेमींमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी शिवजयंती उत्सव व मिरवणुकीसाठी काही नियम, अटी असतील तर त्याचे स्पष्टीकरण लवकर जाहीर करावे. जेणेकरून शिवप्रेमींना कार्यक्रमांची आखणी करून मिरवणुकीचे नियोजन करता येईल, असे शेळके यांनी म्हटले आहे.
महापालिका बरखास्त करा
सोलापूर महानगरपालिकेतील पदाधिकार्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळामुळे शहराचा विकास खुंटला असून अशा परिस्थितीत महानगरपालिका बरखास्त करणेच योग्य ठरेल, असे मत क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष दास शेळके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये व्यक्त केले आहे. शहरात स्मार्ट सिटीच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला असून पदाधिकारी व अधिकार्यांत समन्वय नसल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शहरवासीयांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाण्याचा मुबलक साठा असतानाही नागरिकांचा पाण्यासाठीचा टाहो कायम आहे. शहरवासीयांना मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात विद्यमान पदाधिकारी अपयशी ठरले आहेत, असा आरोप शेळके यांनी केला आहे.