अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसाठी माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोणतीही राजकीय गडबड, गोंधळ होऊ नये म्हणून शिंदेसेना व काँग्रेस पक्षाचे 40 उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे.
अक्कलकोट मधील या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात ही पहिलीच निवडणूक होत आहे.
अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही नगरपालिकेत शिंदेसेनेच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात आहेत.
भाजप, काँग्रेस आणि शिंदेसेना अशी तिरंगी लढत होणार असून अशात काही उमेदवारांनी माघार घेतल्यास पक्षाला फटका बसण्याची भीती वर्तवण्यात आल्याने शिंदेसेनेचे सर्वेेसर्वा तथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी आपापल्या उमेदवारांना सुरक्षित आणि अज्ञात स्थळी हलवले आहे.
अर्ज माघार घेण्याची तारीख संपल्यानंतर यांना पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात येणार आहे. या उमेदवारांशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून या सर्वांचे मोबाईल देखील बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उमेदवार समोर आल्याशिवाय माघारची कार्यवाही करू नये अशा प्रकारची विनंती करणारे निवेदन पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

