गुवाहाटी : आसाममधील धुबरी जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीत आज गुरुवारी सुमारे ३० जणांना घेऊन जाणारी नाव उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण बुडण्याची भीती आहे. धुब्रीचे उपायुक्त अनबामुथन एमपी यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अजूनही ६ ते ७ लोक अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत धुबरी विभागीय अधिकारी संजू दासही बेपत्ता झाल्याची माहिती आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने नदीत बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती देताना ज्ञानेंद्र देव त्रिपाठी म्हणाले की, धुबरी-फुलबारी पुलाजवळ एक छोटी जलवाहिनी आहे. लाकडी नावेवर कालवा ओलांडत असताना ही नाव प्रवाहात कशावर तरी आदळली आणि उलटली. बोटीत सुमारे ३० लोक होते, त्यापैकी बरेच लोक धुबरी मंडळ कार्यालयातील होते.