लता मंगेशकर, दुर्गा भागवत आणि शोभा गुर्टू यांच्या आठवणींनी रसिक भारावले
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापुरातील प्रिसिजन वाचन अभियानाची संध्याकाळ स्त्रीशक्तीच्या प्रेरणादायी स्मृतींनी उजळून निघाली. संगीत, साहित्य आणि संस्कृतीच्या विश्वात अमिट ठसा उमटवणाऱ्या लता मंगेशकर, दुर्गा भागवत आणि शोभा गुर्टू यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत प्रख्यात लेखक-पत्रकार अंबरीश मिश्र यांनी रसिकांना एका वेगळ्याच भावविश्वात नेले.
प्रिसिजन फाउंडेशन आयोजित प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत शनिवारी (७ मार्च) सायंकाळी येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे हा साहित्यसंवाद रंगला. अंबरीश मिश्र यांच्या निवडक लेखांचे अभिवाचन आणि त्यांच्याशी संवाद असा कार्यक्रम झाला. अभिवाचनात प्रसाद फणसे सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रसाद फणसे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या आवाजात सोलापूरकरांसाठी संदेश सादर करत वातावरणात वेगळीच रंगत आणली. त्यानंतर अंबरीश मिश्र यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्याशी संबंधित आठवणी सांगत कार्यक्रमाची सुरुवात केली. १९८१ मध्ये झालेल्या भेटीपासून ते अछूत कन्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातील किस्स्यांपर्यंत अनेक आठवणी त्यांनी रंगतदार शैलीत सांगितल्या. कंगन, बंधन आणि झुला या चित्रपटांच्या यशामागील कथा तसेच एस. मुखर्जी आणि अशोक कुमार यांनी एकाच वेळी बॉम्बे टॉकीज आणि फिल्मिस्तान या दोन कंपन्या कशा उभारल्या, याचा रोचक मागोवा त्यांनी घेतला. ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ या पुस्तकातील ‘अशोक कुमार’ या लेखाचे त्यांनी अभिवाचन केले. यावेळी “आएगा… आनेवाला” हे गीत त्यांनी गुणगुणताच सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमले.
यानंतर ‘झाडं, फुलं नि पाऊस’ या लेखातून त्यांनी कोविड काळातील अनुभव मांडले. जीवनातील निसर्ग, एकांत आणि संवेदना यांचा स्पर्श या लेखातून प्रकट झाला. या लेखाचे प्रभावी अभिवाचन प्रसाद फणसे यांनी केले. “काळ बदलत नाही, जमाना बदलतो; काळ अनंत असतो,” असे चिंतनशील वाक्य उच्चारत मिश्र यांनी विचारांची नवी दिशा दिली.
लता दीदींनी देशाला सांस्कृतिक बंधनात बांधले
महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी लता मंगेशकर, दुर्गा भागवत आणि शोभा गुर्टू यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. लता मंगेशकर यांच्यावरील लेखाचे अभिवाचन फणसे यांनी केले. बडे गुलाम अली खान, मुकेश, मदन मोहन, मोहम्मद रफी, तलत मेहमूद यांसारख्या दिग्गजांनी लतादीदींच्या स्वरांविषयी व्यक्त केलेले गौरवोद्गार त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतरच्या अस्थिर काळात देशाला सांस्कृतिक बंधनात बांधण्याचे काम लता मंगेशकर यांच्या स्वरांनी केले, असे मत मिश्र यांनी व्यक्त केले. त्यांच्या विनोदबुद्धीचे आणि शिस्तप्रियतेचे अनेक किस्सेही त्यांनी सांगितले.
दुर्गाबाई निर्भीड होत्या
दुर्गा भागवत यांच्या आठवणी सांगताना मिश्र म्हणाले, “१९७८ साली त्यांची भेट झाली तेव्हा त्यांच्या साधेपणाने मी भारावून गेलो होतो. २०वे शतक हे स्त्रियांचे शतक आहे. पुरुष अधिकार गाजवतात; स्त्रिया लोकशाही जगवतात.” आणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत यांनी केलेल्या निर्भीड भूमिकेची आठवण त्यांनी जागवली. यावेळी त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या काही आठवणी सांगत सभागृहात हास्याची लकेर उमटवली.
शोभा गुर्टूंमुळे महाराष्ट्राला ठुमरी कळाली
शोभा गुर्टू यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले, “जसे साडीला फॉल लागतो, तसे कलाकारांना रसिक लागतात.” उत्तर भारतीय ठुमरी आणि दादरा या गायकीचा सुगंध महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय शोभा गुर्टूंना जाते, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर प्रसाद फणसे आणि अंबरिश मिश्र यांनी काही शेर सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माधव देशपांडे यांनी प्रस्ताविक केले. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. साहित्य, संगीत आणि आठवणींच्या संगमाने रंगलेली ही संध्याकाळ सोलापूरच्या रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.

