सोलापूर ः स्व. उमाकांत राठोड हा तडीतापडीचा नेता होता. सर्वसामान्य गोर-गरीबाच्या कामासाठी शासकीय सर्व कार्यालय पिंजून काढून ते काम मार्गी लावण्याची तळमळ त्यांच्यात होती. त्यामुळे या भागातील नागरिकाना उमाकांत यांच्या नेतृत्वाची आज गरज असलयाचे मत माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले.
स्व. उमाकांत राठोड यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बेालत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूरच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बाळासाहेब शेळके, माजी महापौर अलका राठोड, एम. डी. कमळे, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण फुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, संचालक राजू वाघमारे, सिध्दार्थ गायकवाड, बोरामणी पंचायत समितीचे सदस्य धनेश आचलारे, राजू गायकवाड, विश्राम गायकवाड, नागराज पाटील, कासेगावचे सरपंच शंकर वाडकर, मुळेगावचे उपसरपंच शिवराज जाधव, तुकाराम कोळेकर, अंकुश माने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले, उमाकांत हा झोपडीमध्ये जावून लोकांमध्ये मिसळून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडति होते. त्यामुळे या भागातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घरचा माणूस असल्यासारखे वाटायचे. त्यामुळे विजय राठोड यांना देखील मी नेहमी लोकांच्या समस्या सोडविण्यास सांगत आहे. कारण या भागातील सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे 14 गावच्या लोकांना पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी उमाकांत यांनी आपल्या काळात संघर्ष केला आहे. तरी या भागातील शेतकर्यांना पाणी मिळण्यासाठी उजनीमध्ये त्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मंत्रालय स्तरावर ते करून घ्यावे लागते. परंतु चुकीचा निर्णय झाल्यामुळे आज आपल्याला अद्याप पाणी मिळाले नसल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव न घेता वक्तव्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा सरपंच विजय राठोड यांनी 14 गावच्या पाणी मिळाले तरी राठोड साहेबांचे स्वप्न साकार होणा असल्याचे सांगितले.
शिलाई मशीन प्रमाणपत्राचे वाटप
दारूचा व्यवसाय सोडून इतर उद्योग करावे यासाठी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते 23 महिलांना शिलाई मशीन प्रमाणपत्राचे वाटप केले. यावेळी बोलताना सातपुते म्हणाल्या, अवैध दारू धंद्यावर कारवाई करायची आमची इच्छा नाही परंतु जर का सांगूनही ऐकत नसती तर नाईलाजस्व कारवाई करावी लागेल.