येस न्युज मराठी नेटवर्क । ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड करणाऱ्या टीम इंडियासाठी पुढचं आव्हान तयार आहे. पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. पितृत्वाच्या रजेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचं दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला होता. त्याने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन केले. त्यामुळे इशांत शर्माची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. इशांत शर्मानं फेब्रुवारी २०२० मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं होतं. त्याशिवाय कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करण्यास सज्ज आहे. २०१८ नंतर हार्दिक पांड्याचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.