मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. भर उन्हात बाज टाकून उपोषणाला बसलेल्या जरांगे यांची आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, सरकारच्या आश्वासनांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जरांगे यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पुन्हा उच्चार करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. उन्हात बसण्याऐवजी सावलीत बसावं, आरोग्याची काळजी घ्यावी आणि उपोषण स्थगित करावं, अशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली. मात्र, मी उन्हात बसल्यावर सरकारला चटके बसतील, पण त्यातून माझ्या समाजाचं भलं होईल, अशी ठाम भूमिका यावेळी जरांगे यांनी मांडली .
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील अभ्यासकांनी संध्याकाळपर्यंत अंतरवालीत यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं. तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्या पुन्हा एकदा सरकारसमोर ठेवल्या. जरांगे यांच्या प्रमुख दहा मागण्यांमध्ये मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं, सातारा गॅझेटची अंमलबजावणी, आंदोलनातील गुन्हे मागे घेणं, बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना नोकरी देणं, सारथीच्या योजना सुरू करणं, कुणबी प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी देणं, मराठा उपसमिती बरखास्त करणं आणि स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करणं यांचा समावेश आहे.









