वडाळा येथे लोकमंगलच्या बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन
सोलापूर : भविष्यात अधिकाधिक बालसंस्कार केंद्रे उभी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील. मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे मोठे कार्य या शिबिरातून होणार असून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवासी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन वडाळा येथे पार पडले. यावेळी आ. देशमुख बोलत होते. लोकमंगल महाविद्यालय परिसरातील राम मंदिरात आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी ह.भ.प. अरुण पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध गावांमध्ये बालसंस्कार केंद्रे सुरू करण्यात आली असून त्याचेच पुढे निवासी शिबिरात रूपांतर झाले आहे. बालवयात होणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे असून अनेक बाल वारकरी भविष्यात कीर्तन व प्रवचनासाठी तयार होत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. विजय बिज्जरगी महाराज यांनी संत परंपरा, अध्यात्म आणि बालसंस्काराचे महत्त्व विशद केले. माजी पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन गुरवसे यांनी आ. सुभाष देशमुख कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्णत्वास नेतात, असे सांगितले.
तीन दिवसांच्या निवासी शिबिरात सामाजिक, आध्यात्मिक व शारीरिक शिक्षणासोबतच पखवाज वादन, गायन, कीर्तन सेवा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक बालक व युवक या शिबिरात सहभागी झाले आहेत.
सुंदर आणि स्वच्छ गावासाठी पुढाकार घ्या : आ. देशमुख
समाजात परस्पर सहकार्याची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. निसर्गाने दिलेला ऑक्सिजन जपणे ही आपली जबाबदारी असून गाव सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.










