सोलापूर – तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेतर्गंत शुक्रवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असललेल्या तृतीयपंथीयांनी आपल्या समस्या मांडत शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा उद्योग केंद्राचे राजशेखर शिंदे, निरामय आरोग्य धाम संस्थेच्या अध्यक्षा सिमा किणीकर, क्रांती महिला संघाच्या अध्यक्ष रेणुका जाधव, दोस्ताना संघाचे आयुब शेख आदी उपस्थित होते.
एखादा माणूस तृतीयपंथी असला तर समाजच नाही तर कुटुंबियही त्याची अवहेलना करतात. आमच्यावर अनेक मर्यादा घातल्या जातात. त्यामुळे घरात राहत असूनही घुसमट होते. ही घुसमट दूर करण्यासाठी स्वताचे घरकुल द्या, अशी मागणी तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली.
तृतीयपंथी जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय योजना तृतीयपंथीयांना उपलब्ध करून देणे शक्य होत नाही म्हणून तृतीयपंथीयांनी शासन दरबारी आपली ओळख निर्माण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.
याप्रसंगी बार्टी प्रकल्प अधीकार प्रणिता कांबळे, राजश्री कांबळे, सर्व समतादूत, समाज कल्याण निरीक्षक, सर्व समाज कल्याण कर्मचारी उपस्थित होते.













