प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या जेवणासह सर्व सुविधा उत्कृष्ट मिळत आहेत का याची खात्री
सोलापूर, दि. २९ सप्टेंबर – सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अप्पर तहसील मंद्रूप अंतर्गत वडकबाळ तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे भेट देऊन पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या मदतीबाबत माहिती घेतली.
वडकबाळ येथे नागरिकांना प्रशासनाकडून मिळालेल्या लाभांची विचारपूस करण्यात आली. सीना नदी पात्राची पाहणी करून विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच बसव नगर येथील निवारा केंद्रास भेट देऊन तेथील आश्रित पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करण्यात आली.

डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला, तिऱ्हे येथेही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप पूरग्रस्तांना करण्यात आले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना धीर देत, प्रशासनाच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. प्रशासनाकडून वेळेवर सर्व प्रकारची मदत मिळत आहे का याची खातरजमा केली.

यावेळी त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रांताधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदुणे, तहसीलदार निलेश पाटील, अप्पर मंद्रूप चे तहसीलदार सुजित नरहरे त्यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

