सोलापुरात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपाची पोलीस आयुक्तांकडे मागणी
सोलापूर : प्रतिनिधीसोलापूर शहर-जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या हत्यांच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.
शहरवासीयांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहणे आवश्यक आहे. याकरिता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी स्वीकारले.गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीने अत्यंत उग्ररूप धारण केले आहे. अवघ्या तीन दिवसात तब्बल सहा जणांचे खून झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. सलग घडणाऱ्या हत्याकांडांमुळे संपूर्ण समाजात प्रचंड भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन मे रोजी माधव नगर परिसरात भर चौकात दिवसाढवळ्या झालेली हत्या आणि बोरामणी येथे घरात घुसून झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरली आहे. भर दिवसा लोकांची वर्दळ असताना गुन्हेगार हत्यारे घेऊन रस्त्यावर दहशत माजवत आहेत आणि खून करत आहेत. यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा कसलाही वचक नाही हे स्पष्ट होते. जर सर्वसामान्य माणूस स्वतःच्या घरात आणि रस्त्यावरही सुरक्षित नसेल तर त्यांनी जगावे कसे ? समाजात असलेली ही असुरक्षिततेची आणि भीतीची भावना शहराच्या शांततेसाठी अत्यंत घातक आहे. समाजातील ही अस्वस्थता आणि भीती दूर करणे ही सध्या प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे या सर्व हत्या प्रकरणांचा तपास तातडीने पूर्ण करून हे खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत. तसेच गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या.याप्रसंगी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, भाजपाचे सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्यांक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ प्याटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते.
पोलिसांची गस्त वाढवावी –
महापौर विनायक कोंड्याल गुन्हेगारांना कायद्याचा धाक रहावा याकरिता पोलीस प्रशासनाकडून सतत गस्त ठेवणे, त्यात वाढ करणे, शहरातील सर्वच भागात विशेषतः संवेदनशील परिसरात रात्रीची तसेच दिवसाची पोलीस गस्त वाढवावी. जेणेकरून नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी या परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, असे महापौर विनायक कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.
