औरंगाबाद : गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराची केस मागे घेतल्यानंतर सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील संकट टळलं आहे. मात्र, या प्रकरणावरील प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर मौन सोडलं आहे. नैतिकदृष्ट्या धनंजय यांना आपला पाठिंबा नसल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावरून धनंजय मुंडे कुटुंबातही एकटे पडलेत का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाल्या पंकजा?
धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर या प्रकरणाला मिळालेल्या नाट्यमय वळणानंतर हे प्रकरण संपलं. मात्र, त्यावरील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया अद्यापही सुरूच आहे. पंकजा मुंडे या आज औरंगाबादमध्ये होत्या. यावेळी त्यांना धनंजय मुंडे प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, ‘तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही’, असं पंकजा म्हणाल्या. पण ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही.
‘कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच’, असंही त्या म्हणाल्या.