मुंबई : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडक देणार आहे. मात्र या मोर्चाला आम्ही परवानगी दिलेली नाही. दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत नाही, असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे, असं मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं.
विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. “मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र राजभवनला जावं अशी त्यांची इच्छा आहे पण कोर्टाच्या आदेशानं दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत नाही, आम्ही त्यांना सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत”, असं नांगरे पाटील म्हणाले.
“आम्ही शेतकरी नेत्यांशी चर्चा केलीय. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलाय तसंच आम्ही याच ठिकाणी मोर्चा स्थगित करायला सांगितला आहे. मात्र मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनावर जायला हरकत नाही. अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जर राजभवनाच्या दिशेने जायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करु, असंही नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं.