महाबळेश्वर मधील अवघे एक टीएमसी पाणी क्षमता असलेले धरण आठ दिवसात भरले. लोणावळ्यातील अडीच टीएमसी क्षमता असलेले धरण पाच दिवसात भरले. मात्र तब्बल 123 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेले महाकाय उजनी धरण कधी भरणार याची चिंता राज्याला लागली आहे. सोलापूर जिल्हा पावसासाठी आतुरलेला आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी पावसाने सोलापुरात हजेरी दिली त्यानंतर तो सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे एकीकडे सोलापूरकरांची चिंता वाढत असली तरी दुसरीकडे मात्र उजनी धरणात खूप मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्यामुळे धरण मायनस मधून लवकरच प्लस मध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे. काल सकाळी सहा ते आज सकाळी सहा ची आकडेवारी पाहता एक टीएमसी एवढे पाणी उजनी धरणात आले. त्यामुळे मायनस 28.11 एवढी पाणी पातळी असलेल्या धरणात आज सकाळी मायनस 27 एवढी पाणी पातळी होती. आज सकाळी सहा वाजता दौंड मधून 14,351, दहा वाजता 24 हजार क्युसेक एवढ्या वेगाने पाणी येऊ लागले आहे. लोणावळा, भीमाशंकर या परिसरात अतिवृष्टी होऊ लागल्यामुळे पुण्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. उजनी धरणाच्या वरती असलेली सुमारे 19 धरणातील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. भीमा खोऱ्यात मेघ राजा प्रसन्न झाल्यामुळे याचा फायदा उजनी धरणाला होऊ लागला असून पुण्यातील दौंड मधून मोठ्या प्रमाणावर पाणी उजनीत मिसळू लागले आहे.त्यामुळे उजनी धरण येत्या आठ दिवसात प्लस मध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे.











