त्रिवेंद्रम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तसेच केरळ राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांची त्रिवेंद्रम येथील केरळ विधानसभा कार्यालयात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सृजन अभियान राबविताना झालेली अनागोंदी, नियोजनातील त्रुटी, कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणी तसेच पदाधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी सादर केले.
भेटीदरम्यान खालील महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या :
१) आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी मंडळाच्या भावना तसेच सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विषयांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (CWC) बैठकीत विचार करण्यात यावा.


२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार व विद्यमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संघटनात्मक प्रश्नांबाबत माननीय काँग्रेस अध्यक्ष, माननीय राहुल गांधी, माननीय प्रियंका गांधी आणि पक्षातील अनुभवी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात यावा.
३) विद्यमान निवड प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या नैतिक, संघटनात्मक व लोकशाही संदर्भातील प्रश्नांचा विचार करून सदर प्रक्रिया स्थगित अथवा बरखास्त करण्यात यावी. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत स्वतंत्र व निष्पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. काँग्रेस पक्षाच्या संविधानातील अनुच्छेद २२, २३ व २४ नुसार पारदर्शक, लोकशाही आणि नैतिक अधिष्ठानावर आधारित जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी.
तसेच सृजन अभियानासाठी सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक, ओडिशा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार देवाशिष पटनायक यांनी सादर केलेल्या अहवालाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
मा. रमेश चेन्निथला यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य स्तरावर याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनहित आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविले जातील, असा विश्वास मा. रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला.











