प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या समृद्धी ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत कासेगाव येथे सिमेंट नाला बांध (CNB) क्रमांक ३ चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
जलसंधारण व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने नितीन फलटणकर, माधव देशपांडे, वैशाली बनसोडे, सेवावर्धिनीचे प्रकल्प व्यवस्थापक चन्नवीर बंकुर, कासेगावचे उपसरपंच शहाजहान शेख, कृषी सहाय्यक विशाल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर रोकडे, संभाजी चौगुले, प्रकल्प समन्वयक शिरीष तेरखेडकर, प्रदीप माने, रेश्मा कदम तसेच शेतकरी चंद्रकांत चव्हाण, बाबुराव माने, इंद्रजीत देवमाने, लक्ष्मण जाधव, पाणलोट व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने भूमिपूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून तसेच कुदळ मारून सिमेंट नाला बांध क्रमांक ३ च्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामांबाबत समाधान व्यक्त करत प्रकल्पाचे कौतुक केले.
समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत यापूर्वी गावामध्ये दोन सिमेंट नाला बांध, एक शेततळे तसेच दोन LBS ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याशिवाय आणखी दोन शेततळे व LBS ची कामे प्रस्तावित असून लवकरच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये अजून काही सिमेंट नाला बांध (CNB) प्रस्तावित असून टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात येणार आहेत. गावातील बांधबंदिस्ती दुरुस्तीची कामे आणि नवीन बांधबंदिस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व कामांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास हातभार लागणार आहे.
यावेळी मान्यवरांनी जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व सांगताना पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून गावकऱ्यांनीही या कामात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी प्रिसिजन फाउंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेचे आभार मानले. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणासाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे भविष्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








