राज्यातील 14 साखर कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातून सुमारे 2650 कोटी रुपयांचे थकहमी कर्ज देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने प्रस्ताव मंजूर केले होते. मात्र यातील सात प्रस्ताव मंजूर केले असून सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यासह इंदापूरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भोर येथील राजगड साखर कारखाना, धाराशिव जिल्ह्यातील श्री विठ्ठल माई साखर कारखाना आणि पुणे येथील रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याला सह एकूण सात प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी एनसीडीसीचे कर्ज मंजूर करण्यासाठी मोठा खटाटोप केला होता. एवढेच नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र केंद्र सरकारने सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याला झटका देऊन कर्जाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे आता धर्मराज काडादी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

