सोलापूर – दि. २४ मार्च हा दिवस प्रतिवर्षी शहर क्षयरोग केंद्र सोलापूर महानगरपालिका यांचे वतीने “जागतिक क्षयरोग दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे यामध्ये जनजागृतीपर रॅली ,पथनाट्य, व्याख्याने, निक्षय-मित्र सन्मान कार्यक्रम ,टीबी तपासणी व स्क्रीनिंग शिबिरे ,निबंध पोस्टर, रांगोळी स्पर्धा ,नवीन निक्षय मित्र शोधणे व त्यांच्या हस्ते फूड बास्केट रुग्णांना देणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक माध्यमाद्वारे कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने सोलापूर शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते फूड बास्केट वाटप पंधरवडा साजरा करण्यात येत आहे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रश्नमंजुषा ,क्षयरोग विषयक व्याख्याने, सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांच्या पोस्टर बॅनर्स स्पर्धा तसेच All India Institute of local self govt college येथे क्षयरोग विषयक जनजागृतीपर व्याख्यान आयोजित केले आहेत.
दिनांक 24 मार्च 2024 पासून यावर्षी देखील 100 दिवसीय प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिर, एच बी टी येथे होणार आहे. सन 2026 मध्ये टीबी अधिसूचीत झालेले 620 रुग्ण असून, त्यामध्ये औषधाला दाद न देणारे (MDR TB) 04 रुग्ण आहेत. सदर अभियानामध्ये खालील बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करायचे आहे.
- सर्व जोखीमग्रस्त लोकसंख्येची तपासणी करून राहिलेल्या क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचारावर आणणे.
- क्षयरोगामुळे मृत्यू रोखणे व कमी करण्यासाठी आवश्यक उपाय म्हणून रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष देऊन आवश्यक रक्त तपासण्या करून घेणे (DTC) व पौष्टिक आहार देणे विषयक उपाययोजना करणे
- नवीन क्षयरूग्ण होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी क्षयरोगाच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या करणे व त्यांना प्रतिबंधात्मक उपचार देणे
- लोकसभागातून संपूर्ण समाज क्षयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामध्ये सदर 100 दिवसीय कार्यक्रमात सोलापूरकर वासियांनी सक्रिय सहभाग नोंदवावा क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास मोफत तपासणी व मोफत उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे मा. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मा.अति.आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी वीणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, मा.आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, मा.शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले.

