सोलापूर – अध्यात्म, परंपरा आणि भक्तिभाव यांचा संगम ठरणारा ईश्वरलिंग जत्रा महोत्सव यंदा महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. सुयोध कन्नड संघाच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून रोहिणी नगर-१, विजापूर रोड, ओम गर्जना चौक परिसर सध्या शिवनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
रविवारी १५ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ९ वाजता पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ‘हर हर महादेव’ च्या घोषात भव्य पालखी मिरवणुकीने महोत्सवाचा श्रीगणेशा होणार आहे. पालखी पूजा माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते पार पडणार असून, त्यानंतर परिसरातील नवनियुक लोकप्रतिनिधी जयकुमार माने, दीपक जमादार आणि संगीता जाधव यांचा सत्कार करून त्यांच्या समाजसेवेचा गौरव केला जाणार आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अहोरात्र परिश्रम घेत, तन-मन-धनाने सहकार्य करणाऱ्या श्रीनागेंद्र अल्लमद, गौरीशंकर कडगे, ओमप्रकाश वर्मा, श्रीधर कोळी, राजकुमार उळागड्डे आणि हिप्परगी सावकार यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यांचे योगदान भक्तांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सोमवारी १६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवभक्तीच्या वातावरणात प्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विकास तंबाके, संजय जाधव, अप्पासाहेब दुरुगकर, विक्रम डोंबाळे, पंकज डोंगरे, श्रवण हेब्बळ, विजयकुमार अतनूर, सिद्दप्पा बंटनूर व परमेश्वर कलशेट्टी आदी मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सस्नेह आमंत्रण पुजारी वीरूपाक्ष मठपती तसेच महिला मंडळ अध्यक्षा विमला हेब्बाळ यांनी दिले आहे.
ईश्वरभक्तीचा, सामाजिक ऐक्याचा आणि परंपरेच्या वैभवाचा अद्भुत संगम ठरणारा हा जत्रा महोत्सव सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा सोहळा भक्तिरसाने ओथंबून जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कन्नड विषयाचे प्राध्यापक तथा लेखक डॉ.बी. बी.पुजारी यांनी केले आहे.
