सोलापूर जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेजवळील नांदणी चेक पोस्ट चा अहवाल सादर करा
अतिवृष्टीने झालेल्या शेती पीक व घरांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना व नागरिकांना लवकर मदत मिळेल याबाबत दक्षता
सोलापूर ते मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणने प्रयत्न करावे
सोलापूर, दिनांक 16(जिमाका):-कायद्याच्या कक्षेत बसून सर्वसामान्य वाहनचालकांना चेक पोस्टवर विनाकारण त्रास दिला जात आहे. तसेच या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याने त्यास पायबंद घालण्यासाठी शासन नवीन धोरण आखत आहे. त्या अनुषंगाने आंतरराज्य सीमावर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुख व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजल्हाधिकारी अभिजीत पाटील, सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा, सहव्यवस्थापक अंजनी शर्मा, माजी राज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अमोल शिंदे, रमेश बारसकर यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील नांदणी येथील चेक पोस्टला आपण स्वतः भेट दिलेली असून त्या चेक पोस्ट वरून रोज किती गाड्या पास होतात तसेच अतिरिक्त भार असलेल्या किती गाड्यावर कारवाई केली याचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. तसेच अतिवृष्टीने सोलापूर शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले होते त्याचेही पंचनामे करावेत व असे नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

विमानतळ प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने सोलापूर येथून मुंबईसाठी विमान सेवा लवकरच सुरू होईल या दृष्टीने संबंधित विमान कंपनीकडे पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देऊन कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन जिल्हा प्रशासनाने करावे, असेही त्यांनी सांगितले.
कामगार विभागाच्या वतीने सर्वसामान्य व गोरगरीब कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो परंतु या विभागाकडे बऱ्याच तक्रारी येत असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः या दृष्टीने स्वतंत्र बैठक घेऊन विना तक्रार जिल्ह्यातील सर्व कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच मंद्रूप, दुधनी व बोरामणी येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक होण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता महसूल प्रशासनाकडून व्हावी. एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी उपरोक्त ठिकाणी भेटी देऊन जागा पाहणी करावी व सदरची जागा महसूल प्रशासनाकडून मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर येथील एसटी महामंडळाचे वर्कशॉप एमआयडीसी येथील नवीन जागी लवकरात लवकर सुरू करावे, असेही निर्देश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच पंचनामे कार्यवाही पूर्ण होत असून त्याचा सविस्तर प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विषय सूचीनुसार विषयांची माहिती दिली.
बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मांडलेले विषय व सूचना…
सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात कामगारांसाठी असलेल्या योजनांचा लाभ दिला जात नाही तसेच कागदपत्रांसाठी विनाकारण त्रास दिला जातो त्या अनुषंगाने संबंधितावर कार्यवाही करून कामगारांना योजनांचा लाभ द्यावा.
मंद्रूप ग्रामपंचायत ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून लोकसंख्या 20000 पेक्षा अधिक आहे. तरी या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा तसेच या ठिकाणी एसटी महामंडळाचे बस स्थानक बांधावे.
दुधनी येथे एसटी महामंडळाचे बस स्थानक निर्माण करावे, बोरामणी येथे बस स्थानक निर्माण करावे, सोलापूर येथील एसटी महामंडळाचे वर्कशॉप नवीन जागेत स्थलांतरित करावे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, सोलापूर महापालिकेने सोलापूर शहराचा बृहत आराखडा केला असून तो चुकीचा आहे त्याला स्थगिती देण्याची मागणी. अतिवृष्टी मध्ये सोलापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले याला महापालिके जबाबदार असून सर्व रस्ते नाल्या स्वच्छता याबाबत महापालिकेने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी. टेंभुर्णी येथे अनेक खत कारखाने असून त्यात भेसळ होत असल्याचा संशय असल्याने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी, टेंभुर्णी बस स्थानकावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी, मोहोळ येथे क्रीडा संकुल उभारण्याची मागणी यासह अनेक विविध मागण्या व सूचना पदाधिकारी यांनी मंत्री महोदय व प्रशासनाकडे केल्या.