येस न्युज मराठी नेटवर्क : पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे प्रिसिजनच्या सी एस आर फंडातून उभे केलेल्या सौर पथदिव्यांचे लोकर्पण यतिन शहा आणि डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. सोमवार दि.२ जानेवारी २०२३ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात यतिन शहा बोलत होते. स्वयंचलित यंत्रणा असलेले हे पथदिवे सौर उर्जेवर चालतात. संध्याकाळी सूर्यप्रकाश कमी झाला की दिवे आपोआप लागतात. दिव्याखाली हालचाल झाली की त्याचा प्रकाश आपोआप वाढतो, हे त्याचं वैशिष्ट्य. अशा एकूण ३५ सौरपथ दिव्यांचे लोकार्पण झाले.
चिंचणी ग्रामस्थांनी तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक झाडं लावत व ती उत्तम प्रकारे जोपासत चिंचणीने सोलापूर जिल्ह्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ अशी ओळख निर्माण केली आहे. अत्यंत स्वच्छ, शांत, निसर्गरम्य अशा चिंचणीची दखल नुकतीच भारत सरकारच्या ग्रामविकास खात्यानेही घेतली.’आदर्श ग्राम’ होण्याकडे चिंचणीची वाटचाल वेगाने सुरू आहे. चिंचणीकरांची ही जिद्द पाहून या आधी प्रिसिजन समूहाने गावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी सौरऊर्जा संच आपल्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला होता. आता दुसऱ्या टप्प्प्यात संपूर्ण गावामध्ये तब्बल ३५ सौरदिवे लावले आहेत. गावाने केलेले काम बघून मी भारावून गेलो आहे, गावच्या विकासात महिलांचा सहभाग वाढला तर ते गाव आत्मनिर्भर होऊ शकते हे या गावातील महिलांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखविले, असे यतिन शहा म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मोहन अनपट यांनी केले. गावातील स्वच्छता, शिस्त आणि एकी ही आम्ही प्रिसिजन समूहाकडून शिकता आलं. त्यातून गावाचा विकास करण्यासाठी मदत झाली. प्रिसिजन समूहाने केलेल्या मदतीवर आम्ही व्हायब्रंट चिंचणी चे स्वप्न बघत आहोत आणि भविष्यात ते आम्ही साकार करू. आमच्या सर्वांच्या हाताला प्रिसिजनची साथ मिळाली म्हणून म्हणून आज आमची आत्मनिर्भर गाव अशी ओळख निर्माण केली.
प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा यांनी देखील त्यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानी पुढील काळात या गावाने बायोगॅस आणि सहकारी तत्वावरील शेती यावर भर देण्याचे आवाहन केले.
काय आहे ‘प्रिसिजन- चिंचणी’चा सौरऊर्जा प्रकल्प
प्रिसिजन उद्योगसमूहाने आपल्या सीएसआर फंडातून चिंचणीमध्ये सौरऊर्जा संच बसवला आहे. गावातील स्मशानभूमी आणि विहिरीपाशी मोठे सोलर पॅनल्स बसविण्यात आले आहेत. यामधून वीजनिर्मिती होऊन त्यावर संपूर्ण गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा चालते. नैसर्गिक ऊर्जास्रोत वापरल्यामुळे चिंचणीकरांचं वीजेवरचं अवलंबित्व खूप कमी झाले आहे.तसेच गावातील संपूर्ण सार्वजनिक ठिकाणावरील पथदिवे हे आता सौरऊर्जेवर सुरु केले आहेत.
