येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या 14 लाख 72 हजार 562 विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या 16 लाख 25 हजार 311 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ
यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.