सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधी तीनवेळा जामीन फेटाळल्यांनंतर चौथ्यांदा काल सत्र न्यायालयाने जामीन फेटळला त्यानंतर राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे. मात्र आज राणेंची वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे कोर्टासमोर शरण येणार असल्याची माहिती दिली.
त्यामुळे पुन्हा काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच नितेश राणे यांनी आता एक सूचक ट्विट केलं आहे. अमित शाह यांचा फोटो पोस्ट करत समय बलवान है, असे ट्विट नितेश राणे यांच्याकडून करण्यात आल्याने राणेंचा नेमका रोख कुणाकडे आहे? अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवून मी कोर्टासमोर शरण यायला जातोय. आजपर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीररित्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला, अशी छोटीशी मात्र सूचक प्रतिक्रिया शरण येण्यापूर्वीच नितेश राणे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे. नितेश राणे यांची कोठडी पोलीस मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. त्यामुळे राणेंना आता कोर्ट कोठडी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून राणे जामीन मिळवण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत होते, मात्र त्यांना कोणत्याही कोर्टात दिलासा मिळाला नाही, सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत नितेश राणेंच्या पदरी निराशा आली, प्रत्येक ठिकाणी त्यांचा जामीन फेटाळला. त्यामुळे कणकवली कोर्टात आज नितेश राणे शरण आले आहेत.