नवी दिल्ली : भारतात रविवारी ३७ हजार १५४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या आता वाढून ३ कोटी ८ लाख ७४ हजार ३७६ झाली आहे. त्यापैकी उपचार घेणाऱ्यांची संख्या ही रूग्णांची संख्या १.४६ टक्के आहे. सध्या भारतात ४ लाख ५० हजार ८९९ सक्रिय रुग्ण आहेत. तर देशात अद्याप अशी पाच राज्ये अशी आहेत जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त करत या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक पाठवण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या की, करोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने यापूर्वीच आपले पथक पाठविले आहेत. ज्या राज्यांमध्ये करोना बाधितांमध्ये घट होत नाही आहे त्यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे (ग्रामीण) आणि सांगली ही या जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र आणि केरळ देशातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा असणारी राज्ये आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा ५३ टक्के वाटा आहे.गेल्या २४ तासात कर्नाटकात करोनाचे १ हजार ९७८ नवीन रुग्ण आढळले आहेत तसेच ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोनाचे २८ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर ३५ हजार ८३५ लोकांचा बळी गेला आहे. कर्नाटकमधील बेंगळुरू सर्वाधिक बाधित क्षेत्र असून त्यानंतर मैसूर आणि दक्षिण कन्नड यांचा क्रमांक लागतो.