येस न्युज मराठी नेटवर्क : जगभरात कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात येत नसताना भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी करोनासंदर्भात जनतेला आवाहन केलं आहे. त्यासोबतच, देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून हे संकट उभं राहिलं. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल अशी तयारी आपल्याला करायला हवी”, असं मोहन भागवत म्हणाले. ऑनलाईन व्याख्यान श्रुंखलेमध्ये ते बोलत होते.
आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागेल, असं यावेळी मोहन भागवत म्हणाले. “जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावं लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत”, असं ते म्हणाले.