येस न्युज मराठी नेटवर्क : ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या कामात गावचे प्रमुख म्हणून सरपंचांनी आजतागायत जिल्हा परिषद प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे त्याबद्दल सीईओ स्वामी यांनी गावकारभाऱ्यांचे आभार मानले. आजपर्यंत प्रशासनाने अनेक उपक्रम राबवूनही गावपातळीवर ग्रामस्थांकडून त्रि-सुत्रीचे पालन होताना दिसून येत नाही. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कोविड केअर सेंटर स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु आणखी बऱ्याच गावांत हे केंद्र स्थापन झालेले नाही. तरी
1) कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी गावचे प्रमुख म्हणून व जबाबदार व्यक्ती म्हणून सरपंचांनी ग्रामस्थांना त्रि-सुत्रीचे पालन करण्याविषयी प्रवृत्त करावे.
२) ग्रामस्तरावरीय समिती कार्यक्षम करून कार्यान्वित करण्यात याव्यात.
३) ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य एकत्रित येऊन कोरोना प्रतिबंधक कार्ये गावात तात्काळ सुरू करा.
४) “माझे दुकान माझी जबाबदारी” अभियानात दिलेल्या सर्व सुचनांचे पालन व्यापारी व दुकानदाराकडून करून घ्यावे.
५) पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात जिथे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत तेथे ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्काळ कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात यावे.
६) गावातील डॉक्टरांची तात्काळ भेट घेऊन सभा घेऊन त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये सेवा देण्यास प्रवृत्त करावे.
७) कोविड केअर सेंटरसाठी लागणारे साहित्य, जेवण, नाश्ता यासाठी स्थानिक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांना भेटून त्यांचे सहकार्य घ्यावे व सेंटरची काळजी घ्यावी
८) कोविड केअर सेंटर मधील कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नर्सेस आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आदी सर्व कर्मचाऱ्यांना मनोबल, धैर्य व पाठबळ द्यावे. तिच्या मदतीला आपण सदैव तत्पर रहावे.
९) गाव पातळीवर ताण तणाव व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असून माझ्या ध्वनीफितीचे/चित्रफितीचे प्रसारण करण्यात यावे.
१०) लसीकरण कार्यक्रमासाठी आपल्या गावातील आपले सरकार पोर्टल चे कर्मचारी व मुख्याध्यापक ग्रामसेवक यांच्यामार्फत ग्रामस्थांचे रजिस्ट्रेशन चे काम गावातच पूर्ण करून घ्यावेत व लसीकरण सुरळीत होईल या दृष्टीने प्रयत्न करावे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ मधील सेवकांची नेमणूक व 45 मधील ग्राम सूचीतील अ.क्र २५ मध्ये अशा रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी तरतुदी आहेत त्याप्रमाणे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावावर नियंत्रणाची आवश्यकतेप्रमाणे नियमानुसार कार्यवाही करावी.
त्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी मधून तसेच वित्त आयोगाच्या निधीतून या बाबीवर नियमाप्रमाणे खर्च करण्याबाबत ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून कार्यवाही करावी.
सध्याच्या या महामारीच्या काळात आपण पूर्ण सक्षम पणे काम नाही केले तर इतिहास तुम्हा आम्हाला माफ करणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. असे आवाहन सीईओ स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना विशेष पत्राद्वारे केले आहे.