येस न्युज मराठी नेटवर्क : जगभर आणि भारतभर कोरोनाचं थैमान सुरू असताना IPL स्पर्धा कशी खेळवली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एक सामना देखील पुढे ढकलावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आयपीएलचा उर्वरीत हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. स्थगित झालेली स्पर्धा पुन्हा कधी सुरू होणार? याविषयी देखील चर्चा सुरू झाली असताना BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. “आम्ही लवकरच भेटणार असून स्थगित करण्यात आलेला हंगाम पूर्ण कधी करता येईल, त्याविषयी निर्णय घेतला जाईल. यासाठी आम्हाला स्पर्धा पूर्ण करण्याची कधी संधी मिळेल, ते देखील पाहावं लागणार आहे”, असं राजीव शुक्ला म्हणाले आहेत.
“बीसीसीआयनं तूर्तास आयपीएल स्पर्धा स्थगित करून एक चांगला निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा आहे तिथूनच पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा तिचं पुन्हा नियोजन करण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हा निर्णय हितकारक आहे”, असं ट्वीट राजीव शुक्ला यांनी केलं आहे.











