एकत्रित प्रयत्नातून रस्ते अपघात रोखणे शक्य
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर.) तयार करणारे निम्मे अधिकारी बोगस आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला अभिनेते मकरंद अनासपुरे, खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह नागपुरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, देशात करोनामुळे चिंता वाढली. या आजाराने वर्षभरात १.४० लाख मृत्यू झाले; परंतु प्रत्येक वर्षी देशात ५ लाख अपघातात सुमारे दीड लाख मृत्यू होतात. अपघातात मृतांमध्ये सुमारे ७० टक्के व्यक्ती १८ ते ४५ वयोगटातील असतात. नगरसेवक, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन अपघात नियंत्रणाचे आव्हान स्वीकारल्यास नियंत्रण शक्य आहे. आमच्या खात्याने एका रस्ता सुरक्षा प्राधिकरणाची निर्मिती केली.
त्यावर लवकरच एका अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. या कौन्सिलकडून लवकरच विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जातील. सरकारमध्ये संवेदनशीलता नसल्याने रस्ते सुरक्षेबाबतचे काम कौन्सिलकडून होईल. देशातील निम्म्या अपघाताला चुकीच्या रस्त्यांचे इंजिनीअरिंग जबाबदार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात डी.पी.आर. तयार करणारे निम्मे अधिकारी बोगस व फ्रॉड असल्याचे दिसते. ते विविध कारणे पुढे करत अंडर आणि ओव्हर पासमध्येही अडथळे आणतात. राष्ट्रीय महामार्गावर सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करून सर्व अपघातप्रणव स्थळ संपवल्याचा दावा त्यांनी केला.