मुंबई : राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु असल्याचं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचे सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे युद्ध थेट राज्यपालांकडून नाही तर त्यांच्या आड भाजपकडून खेळण्यात येतंय असं सांगत राजभवनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारचे अनेक महत्वाचे निर्णय हे राज्यपालामुळे रखडले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारण आहे असं राज्यघटना सांगतेय. असं असतानाही राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवलाय. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही.”