सोलापूर शहरातील शंभर वर्ष जुना झालेला दमानी नगरचा रेल्वे ब्रिज 14 डिसेंबर रोजी पाडल्यापासून अनंत यातना या भागातील नागरिक सहन करत आहेत. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार या दोघांनी वाहतुकीसाठी दिलेले पर्यायी तीन मार्ग अत्यंत बेकार आहेत. 54 मीटर रस्ता धूळ युक्त आहे..तिथे लाईटची सुविधा नाही आणि अवंती नगर येथील रेल्वे ब्रिज च्या खालची एकेरी वाहतूक दररोज अपघाताला निमंत्रण देत आहे. खमितकर अपार्टमेंट या ठिकाणी दररोज दुतर्फा प्रचंड मोठ्या वाहतुकीच्या रांगा लागतात. हा रस्ता खड्डेयुक्त आणि घाणेरडा आहे. तर दमानी नगर ते रामवाडी- ते मोदी पोलीस चौकी हा मार्ग काही ठिकाणी अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यातच आता आणखी एक नवीन माहिती एस न्यूज मराठीच्या माध्यमातून पुढे आले असून गेल्या महिनाभरापासून दमानी नगरच्या रेल्वे ब्रिजचे काम थांबले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रेल्वे विभागाला पाठविलेले ब्रिजच्या स्लॅब चे डिझाईन मंजूर झाले परंतु ब्रिजच्या खालचे फाउंडेशनचे डिझाईन अद्याप मंजूर झाले नाही. या ठिकाणी अंतर्गत छोटी -छोटी कामे सुरू असली तरीही मुख्य ब्रिजच्या फाउंडेशन चे कामच पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे हा ब्रिज डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल का हा प्रश्न अधांतरी आहे. या गंभीर प्रश्नाकडे सोलापूर शहरातील आमदार आणि खासदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
