येस न्युज नेटवर्क : लातूर अंबाजोगाई महामार्गावर नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अरुंद महामार्गामुळे बर्दापूर ते अंबासाखर टप्प्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे शनिवारी मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जणांचा मृत्यू झालाय. तर 10 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी (38), स्वाती बोडके (35), शकुंतला सोमवंशी (38), सोजरबाई कदम (37), चित्रा शिंदे (35), खंडू रोहिले (35, चालक) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी (50), सोनाली सोमवंशी (25), रंजना माने (35), परिमला सोमवंशी (70), दत्तात्रय पवार (40), शिवाजी पवार (45), यश बोडके (9), श्रुतिका पवार (6), गुलाबराव सोमवंशी (50) आणि कमल जाधव (30) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे.