आज राज्यातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी पट पडताळणी केली जात आहे. सकाळच्या सत्रात आठ ते 11 आणि दुपारच्या सत्रामध्ये 12 ते 3 या वेळेत ही विद्यार्थी गणना केली जाणार आहे. राज्यभर ही विशेष पट पडताळणी मोहीम राबवली जात आहे. यासाठी शिक्षण विभाग तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तपासणी अधिकाऱ्याला सरल पोर्टलवर एक टॅब उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर विद्यार्थ्यांची उपस्थिती थेट नोंदवली जाणार आहे. याच प्रमाणे 15 आणि 22 एप्रिल रोजी पुन्हा पट पडताळणी करून याच्या अंतिम अहवालावरच शिक्षक सेवक संच निश्चित केले जाणार आहेत. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या कालावधीत झालेली शालेय पट पडताळणीची मोहीम चांगलीच गाजली होती. सध्या होत असलेल्या पट पडताळणी मधून देखील अनेक धक्कादायक आकडेवारी पुढे येणार आहे. याशिवाय आज राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा तर्फे अभियांत्रिकी,औषध निर्माण शास्त्र व कृषी प्रवेशासाठी एमएचटी -सीईटी परीक्षा होत आहे. यासाठी 198 केंद्रावरून तब्बल 4 लाख 79 हजार विद्यार्थी नोंदविले गेले आहेत. त्यामुळे आज राज्यभर पट पडताळणी आणि सीईटी याचीच चर्चा सुरू राहणार आहे.

