सोलापुर – दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग येथील ग्रामदैवत असलेल्या श्री रामलिंग चौड़ेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भक्ती भावाने साजरा झाला या जत्रेला ऐतिहासिक महत्व असून त्याला एक वेगळ्याच पद्धतिचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक स्वरूप त्याकाळी देण्यात आले आहे.
या यात्रेला सर्व धर्म व समाजातील लोकाना न्याय देणारी आणि राष्ट्रीय एकात्मता जपणारी यात्रा म्हणून लौकिक प्राप्त झाले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमावर्ती भागातील वळसंग गावात आज पासून सुमारे दोनशे वर्षा वर्षा पूर्वी वीर नावाच्या एका मुलाने कर्नाटक राज्यातील माशाळ या गावातील मंदिरातून सध्याचे संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले बाळाबटल म्हणजेच चांदीची वाटी हि पळवून आणली अशी आख्यायिका आहे. ही वाटी आणत असतांना विरच्या जीवावर बेतले हे बाळ बट्टल म्हणजेच माशाळ गावचे वैभव मानले जात असे.कारण हे बाळ बट्टल म्हणजे गावचे सुरक्षा कवच ज्या गावात हे बाळ बट्टल राहील त्या गावात कोणतीही नैसर्गिक आपत्ती गावची वेस ओलांडू शकत नाही हे ह्या बाळ बट्टल चे महत्व.
माशाळ गावातून वीर ने ज्यावेळी बाळ बट्टल पळविला तेंव्हा त्या बाळ बट्टलच्या संरक्षणासाठी विरचा पाठलाग करण्यात आला परंतू वीर त्यांच्या हातात येऊ शकला नाही. संपूर्ण रात्र पायी तुडवत विरने कसे बसे वळसंग गाव गाठले त्यावेळी वळसंग गावच्या संरक्षणासाठी गावच्या चारही बाजूनी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंती होत्या त्यामुळे वीरला गावात प्रवेश मिळाला नाही.गावात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या वेशीतील प्रमुख द्वारावर येऊन विरने द्वारपाल (रामोशीला)द्वार उघडण्याची विनंती केली परन्तु रात्रीच्या वेळी वेशीचे द्वार उघडण्यास मनाई असल्याने द्वारपालाने विरसाठी द्वार उघडले नाही त्यामुळे वीरने बाळबट्टल द्वाराच्या छोट्याश्या कमानीतून आत फेकून दिला आणि माशाळ येथून पाठलाग करीत आलेल्या लोकांपासून स्वतः चा जीव वाचवण्यासाठी दिंडुर गावच्या दिशेने पळ काढला तोपर्यंत त्याचा पाठलाग करणाऱ्या मारेकऱ्यानी त्याला अर्ध्यातच गाठून त्याचे शीर धडावेगळे केले परंतु बाळ बट्टल कांही त्यांच्या हाती न लागल्याने त्यांनी वीरचे शीर कलम करून माशाळला नेले.
आज ही दिंडुर रस्त्यावर वीरची समाधी आहे.गावातील सर्व स्थरातील आणि जातीधर्मातील लोकांना एकत्रित करून चौडेश्वरी मंदिर समितीसह मुस्लिम समाज, कोष्टी समाज, माळी समाज,तेली समाज, मातंग समाज, ढोर समाज,बौद्ध समाज, नाभिक समाज, सुतार समाज, कुंभार समाज, चर्मकार समाज यासर्व समाजातील लोकांना यात्रेत वेगवेगळ्या प्रकारे मानकरी म्हणून नेमून सर्व समाजातील लोकांना न्याय देण्यात आला आहे म्हणून या श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या (बाळ बट्टल) यात्रेला सर्व समाजाला न्याय देणारी यात्रा म्हणून ओळखले जाते. सोमवारी अमावस्याच्या रात्री श्रीरामलिंग देवीच्या बाळबट्टलचा थरार भाविकांना पाहावयास मिळाला मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रा पार पडली