नवी दिल्ली: ज्येष्ठ पत्रकार कमाल खान हे शब्दांचे जादूगार होते. त्यांच्या नाराजीतही गोडवा होता. आपल्या पत्रकारितेतून सर्वांची मनं जिंकणारा असा हा अवलिया पत्रकार होता, अशी प्रतिक्रिया पत्रकारिता क्षेत्रातून उमटत आहेत. एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झालं.
ते एनडीटीव्हीचे कार्यकारी संपादक होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. ‘जनज्वार’ या संकेत स्थळाने कमाल खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कमाल खान यांच्या बोलण्याची शैली अनोखी होती. अत्यंत साध्या आणि मोजक्या शब्दात ते मोठा आशय मांडायचे. आपल्या अनोख्या अंदाजाने ते आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायचे.