सोलापूर : मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले .
पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात. या वनस्पती आदिवासींनी व शेतकऱ्यांनी शोधून काढल्या आणि अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या भाज्यांची ओळख आणि त्याचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी सोलापूर येथे विजापूर रस्त्यावर शासकीय मैदानात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान रानभाज्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . रानभाजी वनस्पतींपासून विविध पदार्थ बनवितात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न यांपासून तयार केले जाते. एवढेच नव्हे, तर पोळ्यांसाठीही याच वनस्पती वापरतात. सुमारे १४ वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषधी म्हणून, तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत.