सोलापूर – मानवी जीवनासाठी निसर्गातील पाणी व वृक्ष यासारखी साधनसंपत्ती महत्त्वपूर्ण योगदान देत असताना या साधनसंपत्तीचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.विशेषतः भूजल पातळी वाढविणे , पाणी साठवणे व साठवलेल्या पाण्याचा सुयोग्य वापर ही त्रिसुत्री प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली.
२२ मार्च – जागतिक जलदिन २०२१ निमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे बोलत होते.यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जून गुंडे ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड , वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले ,पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे व या नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असताना आज वन , पाणी , हवामान , वसुंधरा दिवस आदी दिवस साजरे करण्याची वेळ येणे हे खरोखरच दुर्दैव आहे.पूर्वी घरातील काही उत्सव साजरा केल्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला असे म्हणायचे पण आज पाणी हे पैशासारखे खर्च करण्याची वेळ आली आहे याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.यावेळी शाखा अभियंता पुरुषोत्तम हरिसंगम , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षमधील सचिन सोनवणे , शंकर बंडगर ,महादेव शिंदे , प्रशांत दबडे,दिपाली व्हटे , अर्चना कणकी आदी उपस्थित होते.प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी जल प्रतिज्ञेचे वाचन केले.तसेच शाखा अभियंता शाहिर रमेश खाडे यांनी काव्य व गितांमधून आज प्रत्येकाने जलसंवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.सुत्रसंचालन डॉ.ए.सी.मुजावर यांनी केले.दरम्यान जागतिक जलदिनानिमित्त आजपासून २२ मार्च ते २७ मार्च २०२१ या दरम्यान जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
