पालखी मुक्काम, विसावा व रिंगण ठिकाणी सोयी-सुविधांची खात्री करण्याचे निर्देश
जिल्ह्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर त्या त्या नोडल अधिकाऱ्यांनी दिवसातून किमान तीन वेळा पालखी विश्वस्तांशी संपर्क ठेवावा
पंढरपूर- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंढरपूर येथील भक्त निवास सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, यांच्यासह सर्व नोडल अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले,
नोडल अधिकाऱ्यांनी पालखी मुक्काम, विसावा व रिंगणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधा व्यवस्थित आहेत याची खात्री करावी. जर्मन हँगर, फिरते शौचालये, पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था, वैद्यकीय पथके, स्वच्छता यांची पाहणी करून व्यवस्था चोख राहील याची दक्षता घ्यावी. या सर्व सुविधा उपलब्ध करणाऱ्या यंत्रणेबरोबर समन्वय ठेवावा.
पालखी प्रमुख व विश्वस्तांशी नियमित संवाद ठेवून त्यांच्या अडी-अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. काही मोठ्या अडचणी आल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क करावा. आजपासून जिल्ह्यात मानाच्या पालख्यांचे आगमन होत असून, प्रत्येक पालखीचे जिल्ह्याच्या सीमेवर प्रशासनातर्फे स्वागत करावे. पालखी विश्वस्तांशी सोयी-सुविधांच्या अनुषंगाने चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सूचित केले.
यावर्षीच्या आषाढी वारी त तीस ते पस्तीस लाख भाविक येतील. त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबबदारीला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. ही खूप मोठी जबाबदारी असून ती गांभीर्यपूर्वक पार पाडली पाहिजे. सर्वांनी मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही उत्कृष्टपणे काम केल्यास यावर्षीची वारीही पूर्णपणे यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी चांगले सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी म्हणाले की, “सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीविषयक सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी उत्कृष्टपणे कामकाज करावे.” त्यांनी पुढे पालखी आगमनाचे वेळापत्रक सांगितले. आज बार्शी येथे कौंडण्यपूरच्या रुक्मिणी माता पालखीचे आगमन झाले आहे. उद्या, दि. १८ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे धर्मपुरी येथे आगमन होत आहे. तर दि. २० जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी, अकलूज येथे आगमन होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने पालखी मार्गावरील सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर ठेवल्या असून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.










