दि. 16 जुलै पासूण होणार 24तास दर्शन व्यवस्था
भाविकांच्या सेवेसाठी 2 हजार 500 मनुष्यबळ कार्यरत राहणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्रींची होणार शासकीय महापूजा
पंढरपूर- आषाढी शुध्द एकादशी दि. 25 जुलै रोजी आहे, आषाढी यात्रा कालावधी दि. 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता असून, यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक सोयी-सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. मंदिराशी संबंधित सर्व धार्मिक प्रथा, परंपरा, विधी तसेच भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी शुध्द एकादशीला पहाटे 2.20 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत समितीमार्फत दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-फॅन, मिनरल वॉटर आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
परंपरेप्रमाणे दि. 16 जुलै रोजी श्रींचा पलंग काढून दि. 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार आहे. शासकीय महापूजा, मंदिर समितीमार्फत होणारी श्रींची पाद्यपूजा, नित्यपूजा, श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, विविध संस्थांचे नैवेद्य, संतांच्या भेटी, श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, महाद्वारकाला, प्रक्षाळपुजा आदी सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी दर्शनरांग व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात आले असून श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील आठ गाळ्यांपैकी दोन गाळ्यांचा वापर करण्यात येणार आहे. दर्शन मंडप ते कासार घाटपर्यंत स्कायवॉक, स्कायवॉक ते रिध्दि सिध्दी दर्शनमंडपपर्यंत बॅरिकेटींग, ताडपत्री शेड उभारण्यात येत आहे. रिद्धी-सिद्धी दर्शन मंडप परिसरात कायमस्वरूपी दर्शन हॉलचे बांधकाम सुरू असल्यामुळे शेजारील अपशिंगेकर यांची जागा भाडेतत्त्वावर घेऊन तात्पुरते पत्राशेड उभारण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मण पाटील मंदिर ते गोपाळपूरपर्यंत दर्शनरांगेत तीन ठिकाणी अतिरिक्त पत्राशेड उभारण्यात येणार असून पदस्पर्श दर्शनासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप ते स्वेरी कॉलेज, गोपाळपूरपर्यंत सुमारे सहा किलोमीटर लांबीची दर्शनरांग राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तांत्रिक मान्यता व विद्युत शाखेमार्फत इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यात येणार असून दर्शनरांगेत आठ ठिकाणी तात्पुरते उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. मुखदर्शनासाठी श्री संत तुकाराम भवन ते छत्रपती संभाजी चौकपर्यंत बॅरिकेटींग व ताडपत्री शेड तसेच छत्रपती संभाजी चौक येथे हलता पूल बसविण्यात येणार आहे.
दर्शनरांगेत शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खिचडी वाटप, कुलर, भक्तिगीते, लाईव्ह दर्शन, हिरकणी कक्ष, चार ते पाच विश्रांती कक्ष, ईओसी केंद्र, हरवले-सापडले विभाग, अन्नछत्र, सार्वजनिक सूचना प्रणाली, स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अतिदक्षता विभाग, चौकशी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
देणगी व्यवस्थेसाठी अतिरिक्त स्टॉल, सोने-चांदी भेटवस्तूंसाठी स्वतंत्र कक्ष, वेदांत, व्हिडिओकॉन व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे निवास व्यवस्था, भाविकांसाठी अपघात विमा योजना, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम, बहुभाषिक चौकशी कक्ष, दोन अद्ययावत रुग्णवाहिका, उपजिल्हा रुग्णालयामार्फत अतिदक्षता विभाग व प्रथमोपचार केंद्र, भारत सेवाश्रम संघ, कलकत्ता व वैष्णवी चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्यामार्फत वैद्यकीय सुविधा तसेच बाजीराव पडसाळी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामार्फत वैद्यकीय कक्ष उपलब्ध राहणार आहे.
मंदिरात मोबाईल व कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे पाच ते सहा ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, भाविकांसाठी बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद अल्प दरात उपलब्ध राहील. चंद्रभागा नदीपात्रात चेंजिंग रूम, दर्शनरांगेत हिरकणी कक्ष तसेच आषाढी एकादशी निमित्त मंदिरात विशेष फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान मंदिर समितीचे कायम कर्मचारी, हंगामी कर्मचारी स्वयंसेवी संस्थांचे सुमारे स्वयंसेवक असे एकूण सुमारे 2 हजार 500 मनुष्यबळ भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. यात्रेदरम्यान पदस्पर्श दर्शन 22 तास 15 मिनिटे तर मुखदर्शन 24 तास उपलब्ध राहणार आहे. सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट, बॅग स्कॅनर मशिन, मॅन काउंटिंग मशीन, 150 सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, जनरेटर, 40 वॉकी-टॉकी संच, सार्वजनिक सूचना प्रणाली, चौकशी कक्ष आदी सुविधा उपलब्ध राहतील.
श्री संत तुकाराम भवन येथे ईओसी केंद्र उभारण्यात येणार असून तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. येथे सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, लाईव्ह दर्शन, सार्वजनिक सूचना प्रणाली, अग्निशमन वाहन व वॉकी-टॉकी व्यवस्था राहील. चंद्रभागा नदीपात्रात एसडीआरएफ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक पोहणारे, मंदिर कर्मचारी आदी मिळून सुमारे 250 कर्मचारी कार्यरत राहतील. महिला भाविकांसाठी 25 चेंजिंग रूम व 6 हिरकणी कक्ष महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसह उपलब्ध राहणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
सदरची यात्रा निर्विघ्न, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य आमदार रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अँड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, प्रणिता भालके, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखाधिकारी मुकेश अनेचा तसेच मंदिर समितीचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, स्वयंसेवक आणि सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने परिश्रम घेत आहेत.











