कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या दहाव्या महामेळ्यातील सूर
सोलापूर: कन्नड ही केवळ संवादाची भाषा नसून ती कर्नाटकाची संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. बदलत्या काळात कन्नड भाषेसमोर उभ्या राहणार्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर तिच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत देशभरातील कन्नड संघटनांच्या महामेळाव्यात व्यक्त करण्यात आले. कर्नाटकाबाहेरील कन्नड भाषिकांना मदत व प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक विद्यावर्धक संघाने राज्य सरकारशी समन्वय साधून ठोस कार्यक्रम राबवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
येथील हुतात्मा स्मृती मंदीरातील शिवयोगी सिध्दरामेश्वर विचारपीठावर धारवाड येथील कर्नाटक विद्यावर्धक संघ यांच्यावतीने आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध कन्नड संघटनांच्या सहयोगाने आयोजित दहाव्या अखिल भारतीय राज्याबाहेरील कन्नड संघांच्या प्रतिनिधिंच्या दोन दिवसीय महामेळ्याचा शुभारंभ उत्साहात झाला. किरीटेश्वरमठाचे निरंजनमूर्ती स्वामीनाथ महास्वामी यांच्या सानिध्यात झालेल्या या मेळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक विद्यावर्धक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बेल्लद होते. यावेळी हंपी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू मल्लिका घंटी, माजी शिक्षण आयुक्त वेंकटेश मल्लप्पनवरू, बसवप्रभु होसकेरी, शंकर कुंबी, शिवानंद भाविकट्टी यांच्यासह विद्यावर्धक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही दोन भारतीय भाषांमध्ये कोणताही संघर्ष नाही. मात्र सगळ्याचे भाषांना इंग्रजी गिळकृंत करत असल्याने सर्वच भाषांसमोर अस्तित्व जपण्याचे आव्हान आहे. भाषा ही संस्कृती संवर्धनाचे माध्यम आहे. म्हणून प्रत्येकाने कन्नड भाषा जपायला हवी असे आवाहन या महामेळ्यातील वक्तांनी केले. भाषा कधीही संघर्षांचे कारण ठरत नाही. मात्र भाषेच्या आडून राजकारण करणार्यांकडून भाषेचा वापर शस्त्रसारखा होतो, त्यासाठी आपण संर्वांनी सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
बसवप्रभु होसकेरी यांनी प्रास्ताविकात विद्यावर्घक संघाने या पूर्वी घेतलेल्या 9 महामेळांचा आढावा घेतला. सोलापूरात आल्यानंतर आपल्याला कर्नाटकाबाहेर आल्यासारखे अजिबात वाटत नाही. राजकीय सीमा जरी आखल्या गेल्या असल्यातरी संस्कृती एकच असल्याचे होसकेरी यांनी सांगितले.
विद्यावर्घक संघाचे सरचिटणीस शंकर हलगत्ती यांनी स्वागत करून कार्यक्रमाची भूमिका सांगितली. सतिश तुरमरी यांनी आभार मानले. प्रारंभी डॉ.ज्योतीलक्ष्मी कोडलगी यांनी वचन गायन केले. दीपप्रज्वलन आणि नाडगीतेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
शरणांची वचने सर्वकालीन मार्गदर्शक
वचनकारांची समकालीन प्रस्तुतता या विषयावरील परिसंवादात कलबुरगी येथील प्रा.मिनाक्षी बाळी यांनी 12 व्या शतकातील शरण चळवळीतून जन्मलेल्या वचन साहित्याचे समकालीनत्व उपगडून दाखविले. शिवयोगी सिध्दरामेश्वर, महात्मा बसवेश्वर आणि अल्लमप्रभु यांच्यासह इतर शरणांच्या वचनांतील दाखले देत डॉ.बाळी यांनी समकालीन संदर्भातील उपयुक्तता सांगितली. आज पूजा पाठ, यज्ञ याग, शतकोटी यज्ञ, कथा पारायण सारख्या कर्मकांडानां अच्छेदिन आल्याच्या पार्श्वभूमिवर वचनांची गरज असल्याचे डॉ.बाळी यांनी सांगितले. या परिसंवादत धारवाड येथील सविता नडकट्टी यांनी शरण साहित्य हे शास्वत साहित्य असून सर्वकालीन मानवजातीला मार्गदर्शक असल्याचे सांगितले. वचन साहित्य वाचविण्यासह शरणांच्या संरक्षणात शिवयोगी सिध्दरामेश्वर आणि राणी चामलादेवी यांचे योगदान मोठे असल्याचे नडकट्टी यांनी सांगितले. ‘सोन्नलगी सिद्धराम’ या विषयावर डॉ.भिमाशंकर बिराजदार, इंदुमती बसवंती आणि एन.एम. मरूळाराध्य यांनी आपले विचार मांडले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के.एस.कौजलगी होते.










