महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. गुगल फॉर एज्युकेशनसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यातील तब्बल 4 लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमाद्वारे शिक्षकांना AI चा जबाबदारीने वापर, आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल साधनांचा प्रभावी उपयोग आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक परिणामकारक शिक्षण देण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. पुढील 18 महिन्यांत हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून प्रशिक्षण मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल.
राज्य सरकार आणि गुगलच्या या संयुक्त उपक्रमामुळे शिक्षकांचे डिजिटल सक्षमीकरण होणार असून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडणारे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.











