सोलापूर, दि. १५ जून : महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे प्रवेशोत्सव तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजन कंपनीचे पी.आर.ओ.माधव देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या विश्वस्त देवई शहा, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित,उपमुख्याध्यापिका माधवी खोत, मार्गदर्शिका दीप्ती शहा, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती लाभली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेचा स्वच्छ,सुंदर परिसर,पताके व फुग्यांची आकर्षक सजावट, रांगोळीची सुंदर रचना, प्रशालेचे कलाशिक्षक यांनी रेखाटलेल्या सुंदर फलक लेखनाने अधिक सुशोभित दिसत होता. सर्व विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवर्षाव करून आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला. यानंतर आकर्षक परिपाठ सादर करण्यात आला.

तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. मित्रमैत्रिणींना भेटण्याची, नवीन वर्गात जाण्याची आणि नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत होती. संपूर्ण शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या चैतन्यपूर्ण उपस्थितीने बहरून गेला होता.
संगीत शिक्षिका पल्लवी खांडवे व सोनाली उंडे यांनी स्वागतगीताद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. प्रशालेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच जिद्द व मेहनतीच्या बळावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठा त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा! असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख अतिथींच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या व इस्रो सहलीस निवड झाल्याबद्दल प्रतीक काकडे, ऑल इंडियन टॅलेंट ओलंपियाड स्पर्धेत राज्यात तृतीय व डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या आयान हरून तांबोळी, एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांक घटकावून 12 हजार रुपये शिष्यवृत्ती संपादन केल्याबद्दल अंशुक कांबळे, ऑलिंपियाड स्पर्धेत राज्यात सातवा क्रमांक संपादन केल्याबद्दल श्रावणी कोंडुभैरी या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे यादीचे वाचन सहशिक्षक अनुप कस्तुरे व अभिजीत पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुप कस्तुरे व राजश्री आगरखेड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास छंचुरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी. कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी फलक लेखन सुंदर रित्या रेखाटले होते.
आयोजनासाठी अभिनंदन उपाध्ये, वैभव बारडकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.











