महायुतीच्या विधानपरिषद जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १७ पैकी १६ जागांवर चर्चा पूर्ण झाली असून भाजप १०, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
सोलापूर, नागपूर, जळगाव, नांदेडसह अनेक जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर ठाणे, नाशिक, परभणी-हिंगोली या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकते. पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र छत्रपती संभाजीनगर-जालना जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष ठाम असल्याने तिढा कायम आहे. आज किंवा उद्या अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जून आहे.











