नागराज मंजुळे, हनमंतराव गायकवाड यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची भव्यता; उपस्थितांना बौद्धिक मेजवानी
उमेद प्रतिष्ठानतर्फे “वाट रेखाटणारी पावलं” व “Grounded Glory” कॉफी टेबल पुस्तकांचे प्रकाशन
बार्शी : बार्शी येथील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात भा.प्र.से. अधिकारी रमेश घोलप यांच्या जीवनप्रवासावर आधारित “इथे थांबणे नाही” या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा तसेच उमेद प्रतिष्ठान निर्मित “वाट रेखाटणारी पावलं” (मराठी) आणि “Grounded Glory” (इंग्रजी) या कॉफी टेबल पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. वाय. यादव होते. प्रकाशन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे व उद्योगपती हनुमंतराव गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दिलीप सोपल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, माय मिरर पब्लिकेशनचे प्रकाशक व प्रसिद्ध वक्ते मनोज अंबिके, ज्येष्ठ नेते प्रा. तानाजी ठोंबरे, डिजिटल मीडिया संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने, रमेश घोलप यांच्या मातोश्री विमल घोलप, त्यांच्या पत्नी रूपाली घोलप, सौ. वैशाली गायकवाड, श्री शिवाजी कांबळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
“आयुष्यात एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना” – रमेश घोलप
रमेश घोलप यांनी ज्या परिसरात शिक्षण घेतले, त्याच ठिकाणी हा प्रकाशन सोहळा होत असल्याने हा क्षण अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. संघर्षाच्या काळातील शिक्षक, मित्र, कुटुंबीय आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणे ही मोठी कमाई असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही आपल्या मातीचे नाव उंचावण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

“यशासाठी क्षेत्रांची मर्यादा नाही; स्वतःची क्षमता ओळखा” – नागराज मंजुळे
नागराज मंजुळे यांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी असंख्य क्षेत्रे उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रत्येकाने स्वतःची क्षमता व गुणवत्ता ओळखून योग्य क्षेत्र निवडल्यास यश मिळवता येते, असे त्यांनी नमूद केले. एखादी व्यक्ती मोठ्या उंचीवर पोहोचल्यावर समाज तिचे कौतुक करतो; मात्र त्या यशामागील कष्ट व परिश्रमांकडेही लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले. रमेश घोलप यांचा संघर्ष आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले.

“उद्योग क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टी आणि समाजाभिमुख यश” – हनमंतराव गायकवाड
हनुमंतराव गायकवाड यांनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग समूहाची ओळख निर्माण झाल्याची कहाणी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. करिअर निवडताना उद्योग क्षेत्राकडे सकारात्मकतेने पाहावे आणि वैयक्तिक यशाबरोबर समाजासाठी परत काहीतरी देण्याची जाणीव जपावी, असा संदेश त्यांनी दिला. रमेश घोलप यांनी संघर्षाच्या काळातील परिस्थितीची जाण ठेवत झारखंडमध्ये संवेदनशीलतेने केलेले काम मनाला भावल्याचे त्यांनी नमूद केले.

“बार्शीच्या मातीचा अभिमानास्पद प्रवास” – दिलीप सोपल
दिलीप सोपल यांनी आपल्या भाषणात रमेश घोलप यांच्या स्वर्गीय वडिलांसोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधांचा भावनिक उल्लेख केला. आयुष्यात संघर्ष करताना ढळू न देता स्वतःला सिद्ध करत त्यांनी यश मिळवले, किंबहुना झारखंडमध्ये सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा अधिकारी अशी ओळख निर्माण केली, हे बार्शीकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. “आपल्या मातीतल्या लेकराचे कौतुक आपण केले पाहिजे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढत रमेश घोलप यांच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यात प्रशासनातील सर्वोच्च पदापर्यंत त्यांनी पोहोचावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

“समाजातील अंतिम घटकासाठी कार्य करणारी प्रशासनशैली” – अतुलचंद्र कुलकर्णी
निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी, MAT चे सदस्य अतुलचंद्र कुलकर्णी यांनी पाठविलेल्या संदेशात समाजातील अंतिम घटकासाठी कार्य करण्याची प्रशासनातील वृत्ती रमेश घोलप यांनी जोपासली असल्याचे नमूद केले. झारखंडमध्ये त्यांनी संवेदनशीलतेने केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या लेखनातून विद्यार्थ्यांना व अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“कर्मवीरांच्या विचारांची परंपरा जपणारी संस्था” – डॉ. बी. वाय. यादव
अध्यक्षस्थानावरून डॉ. बी. वाय. यादव यांनी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या संस्थेतून घडलेल्या रमेश घोलप यांच्या प्रकाशन सोहळ्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मुलांना संधी देण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून मामांच्या विचारांची परंपरा पुढे नेली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
“रांगोळीपासून स्वाक्षरीपर्यंत – उत्साहाचा जल्लोष”
कार्यक्रमाच्या प्रारंभी कलाकार रवी सुतकर यांनी साकारलेल्या रमेश घोलप यांच्या आकर्षक रांगोळीचित्राने सर्वांचे लक्ष वेधले. जवळपास आठ तासांच्या परिश्रमातून तयार झालेली ही कलाकृती विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी रमेश घोलप यांच्या पुस्तकांवर स्वाक्षरी घेण्यासाठी व त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी मोठी गर्दी केली.विशेष म्हणजे या पुस्तकाचे मुखपृष्ठ कवी रामचंद्र इकारे यांनी केले आहे. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.





कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रामचंद्र इकारे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप, मार्गदर्शक तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पी. टी. पाटील, नंदनजी जगदाळे, शिवदास नलावडे, कार्याध्यक्ष रामचंद्र इकारे, प्राचार्य दीपक गुंड, बाळासाहेब ढेंबरे, जयकुमार शितोळे, विशाल गायकवाड, विशाल घोलप, गणेश घोलप, खंडू डोईफोडे, अनिकेत माने यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

