सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषदेचे उद्घाटन
सोलापूर, दि. 7- समाजाची खरी गरज ओळखून त्यावर शाश्वत उपायासाठी संशोधकांनी संशोधन केले पाहिजे. तसेच विषारी रसायनाचा वापर कमी करून हरित रसायनशास्त्राच्या दृष्टीने संशोधन वाढवावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भविष्यासाठी रसायनशास्त्र: शाश्वत उपायांसाठी पुढाकार’ या विषयावर आयोजित दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी प्रा. अना रीटा सी. डुआर्ते, नोव्हा विद्यापीठ, पोर्तुगाल, डॉ. रीटा क्रावेरो, नोव्हा विद्यापीठ, पोर्तुगाल आणि प्रा. पेट्रीशिया थॉर्नली क्रावेरो, युनायटेड किंगडम तसेच रसांच्या संकुलाच्या संचालिका अंजना लावंड, डॉ. प्रकाश वडगावकर, डॉ. समीर चिक्कळी, डॉ. विकास कडू , डॉ. सदानंद शृंगारे आदींची पमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. अनिल घनवट यांनी केले.
माजी कुलगुरू डॉ. बंडगर म्हणाले की, विषारी रसायनाच्या अतिवापरामुळे आज पर्यावरणावर परिणाम होत आहे. पर्यावरणास व मानवाला धोका न होता रसायनांचा वापर कशा रीतीने करता येईल, या दृष्टीने संशोधन वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुर्धर व गंभीर आजारांवर देखील गरिबांना परवडणाऱ्या औषधांची निर्मिती व्हावी, या दृष्टिकोनातून देखील औषधी रसायनशास्त्रातील तज्ञांनी संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
युनायटेड किंगडमच्या पेट्रीशिया थॉर्नली क्रावेरो म्हणाल्या की, हरित व शाश्वत उपयोगासाठी लागणाऱ्या रासायनिक पदार्थांची निर्मिती वाढावी. आज जगभरात त्या दृष्टिकोनातून संशोधन सुरू झाले आहे, ही चांगली गोष्ट असली तरी जगाच्या पर्यावरणाला धोका न होता कशा रीतीने रासायनिक पदार्थांचा वापर करू शकतो, यावर आणखीन संशोधन पुढे येणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. पोर्तुगालच्या अना रीटा सी. डुआर्ते यांनी नैसर्गिक द्रव पदार्थांचा वापर वाढणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातील विविध संस्थांमधून संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक सहभागी झाले आहेत.










