मूक आंदोलनाला नांदेडमधून पुन्हा एकदा सुरुवात
नांदेड : मराठा आरक्षणासाठीच्या मूक आंदोलनाला नांदेडमधून पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. त्याचबरोबर आपण संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला आणि त्यासाठी लढण्याची भूमिका मांडली, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठीचे पर्यायही सुचवले.
यावेळी बोलताना संभाजीराजेंनी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचे दाखले देत स्वराज्याचा अर्थ समजावून सांगितला. स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण संसदेतही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडली हे सांगताना संभाजीराजे म्हणाले, मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो.
यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीकाही केली आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता. पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.”
मराठा आरक्षण मिळवण्यासाठीचे पर्यायही त्यांनी यावेळी मांडले. एक वेगळा प्रवर्ग निर्माण करुन त्याला सामाजिक, आर्थिक मागास सिद्ध करा. कारण तुम्ही मागास ठरल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे राज्याने ही जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्याने पुनर्विचार याचिकेचा पाठपुरावा केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.