सोलापूर, दि. 31- संशोधन म्हणजे काय? याचे आकलन हे संशोधक मार्गदर्शकांनी वेळोवेळी करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण संशोधन व्हावे व त्याचा ग्रोथ समृद्ध करण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी संशोधक मार्गदर्शकांनीही स्वतःमध्ये प्रवाहाप्रमाणे सकारात्मक बदल करून घ्यावे. आपल्या देशात संशोधनाच्या संकल्पनेत आणखी प्रगल्भता यायला हवी, असे स्पष्ट मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संशोधन (पीएच.डी) विभागाच्यावतीने सर्व विद्याशाखेच्या सर्व विषयांच्या संशोधन मार्गदर्शकांसाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी ‘संशोधनाचे आकलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, संशोधनाचे बदलते स्वरूप काय आहे हे संशोधन मार्गदर्शकांनी समजून घ्यावे. संशोधनातील नवीन गोष्टी व नव्या प्रवाहाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतात संशोधनाची संकल्पना प्रगल्भ नाही. मुख्य म्हणजे एखाद्या विषयाच्या खोलवर जाऊन संशोधन करणे आवश्यक असते. बारीक-सारीक गोष्टींवर अभ्यास झाला पाहिजे. अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी संशोधनावर नोबल पुरस्कार प्राप्त केला आहे. संशोधनात समृद्धता हवी. कॉन्टिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व आहे. शाळेतील मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात ही एका संस्थेच्या संशोधनावरून सुरू झालेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की, त्यात संशोधनाला वाव असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. केवळ व्यक्तिगत जीवनात स्वतःचा बायोडाटा वाढवून लाभ घेण्यासाठी संशोधन न करता खऱ्या अर्थाने समाजाला आणि देशाला उपयुक्त असे संशोधन व्हावे, असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील डॉ. रेखा शर्मा यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन करताना संगणकातील नवनवीन माहिती तसेच संशोधनात संख्याशास्त्र कसे उपयोगात आणता येते हे सांगितले. डॉ.आशिष लिंगे यांनी ‘संशोधन पद्धतीचा उपयोग व त्यातील निष्पन्नता’ या विषयावर मार्गदर्शन करताना संशोधकांची बदलत जाणारी मानसिकता व भूमिका यावर भाष्य केले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था,अंबाझरी येथील प्रा.डॉ.दिलीप पेशवे यांनी ‘संशोधन आणि नवोपक्रम’ या विषयावर मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी ‘संशोधनातील सर्वसामान्य प्रश्न आणि संशोधनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संशोधन मार्गदर्शकाची भूमिका’ ही महत्त्वाची असल्याचे सांगितले. सहाव्या सत्रात प्र-कुलगुरू डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा यांनी ‘पीएच.डी.ची नियमावली आणि गुवत्तेसाठी आवश्यक बाबी’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. डॉ.एस.डी.राऊत व प्रा.सी.जी.गार्डी यांचे तंत्रसहाय्य लाभले.